Saturday, November 10, 2012

वास्तुपुरुष

मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस भराच्या कष्टानंतर घरी आल्यावर मानवाला अति समाधान मिळते.

मय नावाच्या वास्तु शास्त्रज्ञाने रावणाची लंका बांधली, तेव्हा त्याने सांगितले की प्रत्येक वास्तूचा ( घर, दुकान, मंदिर किंवा असेच कांही ) एक गृहपती असतो, त्यालाच वास्तुपुरुष म्हणतात. घर बांधताना कळत नकळत जीव जंतू मारले जातात, त्यांचे पाप नष्ट व्हावे म्हणून सुध्दा वास्तुयज्ञ करतात. वास्तुपुरुषाची सोन्याची प्रतिमा करुन, त्या सोबत पाच रत्न ठेवून, वास्तुपुरुषाची प्रतिमा उलटी, आग्नेय दिशेस छोटासा खड्डा करुन पुरतात. हाच त्या घराचा वास्तुपुरुष होय. प्रत्येक सणावारी त्याला नैवेद्य अर्पण करतात, असा एक कुळाचार आहे. कांहीजण वास्तुपुरुषाच्या वाढदिवशी ( ज्या दिवशी वास्तुपुरुष पुरला तो दिवस ) सुद्धां नैवेद्य समर्पण करतात.

जर वास्तुपुरुषाला नियमीत नैवेद्य अर्पण केला तर, तो संतुष्ट राहून, घरावर कृपा करतो आणि त्याच्या आशीर्वादाने त्या वास्तुत धनधान्य, संपत्ती, समाधान, पुत्र - पौत्र यांची सतत समृद्धी असते. कारण वास्तुपुरुष नेहमी ‘ तथास्तु ’ म्हणत असतो. म्हणून घरात कांहीही वाईट बोलू नये, वाईट आचरण करु नये, अशुभ - अभद्र बोलू नये असा अलिखीत संकेत आहे.

वास्तुपुरुषाला भूक लागल्यास तो घरभर फिरतो, अन्न शोधतो आणि त्याला अन्न न मिळाल्यास तो उपाशी पोटी घराला शाप देतो, म्हणून वेळोवेळी नैवेद्य दाखवावा. घरात कोणीही अगदी अतिथी सुध्दां आले आणि त्यांनी अन्न मागितले असतां अन्न नाही असे सांगण्याची वेळ आली तर वास्तुपुरुष ‘ तथास्तु ’ म्हणतो, आणि मग घरात अन्न नसण्याची परिस्थिती निर्माण होते. म्हणून जेवण झाल्यावर गृहिणींनी थोडे तरी अन्न झाकून ठेवावे.

पुराणात प्रजापती आणि उषा या दांपत्याला चार पुत्र होते. त्यातील सर्वात धाकटया पुत्राचे नाव होते वास्तोष्पती तथा गृहपती. पृथ्वी ही त्याची गृहस्वामिनी होय. स्वाभाविकच पृथ्वीवर निर्माण केलेल्या प्रत्येक वास्तूचा हा ‘ गृहपती ’ अथवा ‘ वास्तुपती ’ असतो, त्यालाच वास्तुपुरुष संबोधतात.

Thursday, November 08, 2012

विडा

हिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने धर्मराजाला सुचविले, सर्वांचे भोजन झाले आहे, तरी आता त्यांना तृप्तीचा ढेकर देण्यासाठी, हे धर्मराजा सर्वांना सुवासिक असे कांहीतरी खाण्याची व्यवस्था कर. आणि त्याप्रमाणे सर्वांच्या मनात तशी इच्छा उत्पन्न झाली. श्रीकृष्णाचीच इच्छा म्हटल्यावर धर्मराजांनी आणि इतर पांडवांनी वासुकी नागावर ही कामगिरी सोपवली. आता तो वासुकी नागच, जाऊन कोठे जाणार तर तो पोचला थेट पाताळात. आणि काय करावे हे न सुचून त्याने नागराणीची भेट घेतली. यावर नागराणीने लगेच आपल्या करंगळीचा छोटासा तुकडा कापून दिला आणि म्हणाली हेच घेऊन जा. करंगळी कापल्यावर रक्ताची धार लागली आणि काय करावे हे न समजून वासुकीने तो तुकडा पृथ्वीवर आणला आणि जमिनीत पुरला. पुरताना जमिनीवर रक्त सांडले. त्यातून एक वेल उगवली त्यालाच पांडव नागवेल म्हणू लागले. नागाने लावलेली वेल आणि रक्तातून उगवलेली वेल म्हणून या वेलीची पाने खाली असता तोंड सुवासिक होऊन रक्तासारखे लाल रंगू लागले.

विडा शृंगारप्रधान असल्याने ब्रह्मचारी पुरुष अथवा विधवा स्त्रियांनी खाऊ नये.

अतिथी देवो भव

पूर्वीच्या काळी दुपारी म्हणजेच वैश्वदेवाच्या समयी कोणी घरी आले, मग ते परिचित असोत वा नसोत, जाति-धर्माचे असोत वा नसोत, नातलग असोत वा नसोत त्यांना घरामध्ये बोलावून भोजनादी सोयी उपलब्ध करून, त्यांचा आत्मा शांत होऊ देण्याचा कुलाचार भारतात होता.  पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने आतासारखी नव्हती, लोक पायी अथवा घोड्यावरून प्रवास, तीर्थयात्रा करीत, प्रवासात जिथे थांबतील तिथे त्यांचा पाहुणचार होत असे.

एवढेच नव्हे तर, माध्यान्हकाळी घरातील यजमान आणि इतर मंडळी अतिथीची थोडा वेळ वाट पहात असत, कारण अतिथी हा देवासमान मानला जायचा. देवयज्ञ म्हणजे यजमानाने भोजन करण्यापूर्वी वैश्वदेव करणे. आपल्या अन्नातील थोडातरी भाग देव, मानव, पशू, पक्षी, पितर वगैरे सर्वांना अर्पण करणे तसेच घरामध्ये उखळ, जाते, पाणवठा, सूप अशा पाच ठिकाणी किंवा कळ्त नकळत माणसाच्या हातून जीवहिंसा घडते, त्याचे पापक्षालनार्थ वैश्वदेव करण्यावा हिंदू धर्मात रोजचा कुळाचार होता.  वैष्वदेवासाठी चुलीवर शिजवलेल्या भांड्य़ातील भातापैकी थोडा भात घेऊन त्यावर तूप घालून अन्नशूद्धी करतात. मग त्याचे तीन भाग करून एकाभागाची अग्निदेवाला आहुती देतात, दुसर्‍याने भूत यज्ञ म्हणजे बलिहरण करतात आणि तिसर्‍याने पितरांसाठी घराबाहेर जाऊन काकबळी देतात. भारतीय संस्कृतीत अशी वैश्वदेवाची कुळाचार पध्दती होती. परंतु आता कालपरत्वे ही पध्दत नष्ट होत चालली आहे, परंतु ह्यातील फायदा जाणला जात नाही हे दुर्दैव आहे. 

Wednesday, November 07, 2012

कुळधर्म

ज्ञानेश्वर म्हणतात

कुळधर्मु चाळी । विधीनिषेध पाळी ।

मग सुखे तुज सरळी । दिधली आहे ॥

आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे; ती कर्मे कर व जी कर्मे करू नये, असा निषेध केला आहे, ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक दिली आहे.

रामदास म्हणतात – कुळधर्म आणि कुळाचार जसे परंपरेने चालत आले असतील, तसे चालू ठेवावेत. ते उत्तम किंवा मध्यम अथवा मनाला न भावनारे कसेही असले तरी ते पुढील पिढीने चालूच ठेवावेत. आपल्या कुळात कितीही शूद्र देवतांची पूजा असेल तरी ती करावीच.

जो आपल्या कुळातील धर्माचे पालन करतो त्याला ज्ञान व संपत्ती प्राप्त होते शिवाय मानसिक समाधान मिळते.  त्याच्याकडून साधन होते. ज्या घरी कुळाचे आचरण आहे, तेथे कोणतीही अशुभ, अनिष्ट अथवा अघोरी शक्ति आपला प्रभाव दाखवत नाही. कुळधर्म कुळातील लोकांना महत्व व मान प्राप्त करून देतो, आणि इहलोकी व परलोकी पावन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कुळधर्म करत असेल तर तो कुळधर्म त्याला देवी देवतांचे दर्शन घडवितो. तुकाराम महाराजांनी कुळधर्माची सांगड समाजाबाबतच्या कर्तव्याशी घातलेली आहे.

Tuesday, July 03, 2012

पावसासाठी प्रार्थना

मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना

हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या सर्व चुका, गुन्हे आम्ही कबूल करतो. मात्र या ठिकाणी प्रार्थनेसाठी आलेल्या निरागस मुलांकडे पाहून तरी तू पावसाची कृपा कर.
प्रत्येक व्यक्तीच्या हातून काही ना काही चुका होतच असतात. इतकेच नव्हे, तर आम्ही दान दिले नाही, जकात जमा केली नाही, अल्लाहच्या फर्मानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याने पाउस थांबविला असेल, याची आम्हांला जाणीव आहे. आमच्या कडून जे गुन्हे घडले आहेत, ते माफ करून समस्त जातीला पावसाच्या रूपाने दिलासा दे. मानवाबरोबरच या पृथ्वीतलावर असंख्य प्राणी राहतात, निदान त्यांच्याकडे पाहून तरी कृपा कर.

अशी आर्त हाक पुण्यात मंगळवार दिनांक ३ जून रोजी झालेल्या विशेष नमाजाच्या वेळी देण्यात आली.