व्हॅलेंटाईन डे

दैनिक सकाळ मध्ये छापून आलेले एक पत्र -

स्त्री व पुरुष किंवा तरुण - तरुणी यांना परस्परांविषयी प्रेमभावना निर्माण होणे, ही वास्तविक निसर्गाची स्वतःची संस्कृती आहे - जी माणूस टाळू शकत नाही. कारण तो निसर्गाच्या प्रभावाखालीच असतो. या नैसर्गिक भावनेचा अतिरेक होणे हे जितके गैर आहे, तितकेच ती संयमाने व्यक्त करण्याचे मार्ग बंद करुन एकूणच ती भावना दडपणे, हे त्याहून गैर आहे. ' व्हँलेंटाइन डे ' ला मुला - मुलींनी एकमेकांना फूल वा भेटवस्तू देऊन मनातील मुग्ध भावनांना आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोचविण्याचा हा मार्ग निश्चितच सभ्य आणि उच्च अभिरुचिदर्शक आहे. अगदी होळीला तरुण - तरुणींनी एकमेकांच्या अंगाला रंग फासण्याच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत सन्माननीय आणि सभ्य आहे. ज्या वयामध्ये एकमेकांविषयीच्या आकर्षणाची निसर्गतः सुरवात होते, त्या वयाच्या तरुण मंडळींची ही प्राथमिक गरज आहे. म्हणून तरुण मुलामुलींना हा साधा आनंद घेऊ द्यावा. जर दहशतीने, हिंसेने या भावनेचे प्रकटीकरण आपण बंद पाडू लागलो तर दुसर्‍या मार्गाने चोरुन, नजर चुकवीत तरुण मंडळी हे प्रयत्न करीत राहतील. मग ते नैतिक आहे का ? पुण्या - मुंबईसारख्या शहरात, जिथे पालक नोकरीमुळे जास्त व्यस्त आहेत तिथे ' सहलीला जातो सांगून एक दिवस एक रुम शेअर करुन राहणे ' असे मार्ग काही जण अवलंबितात. ' व्हँलेंटाइन डे ' सुद्धा जर त्यांच्यापासून हिरावून घेतला, तर मग ' रुम शेअर ' करणे हाच पर्याय तरुणांसमोर राहील आणि ती संख्या वाढीस लागेल. खरे तर मनात असणार्‍या राग व प्रेम या उद्रेकी भावनांचा योग्य वेळी, योग्य पद्धतीने निचरा होण्यानेच माणसाची त्या विकारातून मुक्तता होत असते आणि मनःस्वास्थ्य स्थिर राहते. मग असे मानसिक ' फिटनेस आणि हेल्थ ' जपणारे योग्य व सौम्य मार्ग संस्कृतीच्या सवंग किंवा चुकीच्या कल्पनांनी का बरं रोखून धरायचे ? त्यापेक्षा ' व्हँलेंटाइन डे ' चे मूळ स्वरुप तसेच ठेवून, त्याला ' भारतीय टच ' दिला तर ? ज्यांना ज्या प्रकारची प्रेमभावना व्यक्त करायची आहे, त्या रंगाचे फूल दुसर्‍याला देण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळणे म्हणजे ' व्हँलेंटाइन डे. असा तो दिवस आपण भारतीय करुन घ्यावा.  ' व्हँलेंटाइन डे ' ला विरोध असणार्‍यांनी तो दिवस बंद करण्यापेक्षा बदलण्याचा प्रयत्न करावा.
मंगला सामंत, पुणे.

या पत्रात किती मार्मिक समाचार घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्वच दिवसांकडे पाहण्याची आज गरज आहे. राजकारणी मंडळी त्यांव्या स्वार्था साठी कोणालाही वेठी्स धरत्तात. शालाशाळांमधून ग्रुप स्थापन करून त्याला राजकीय रंग देतात. नवरात्रात, गणपतीत मिरवणुका काढतात. त्या मिरवणुका कोण आणि कशाप्रकारे आयोजित केल्या जातात, त्यात मुलामुलींचा काय सहभाग असतो, हे आता उघड गुपीत आहे. मग व्हॅलेम्टाईन डे ला विरोध का? कोणी तो साजरा केल्या शिवाय राहणार आहेत का? नवरात्रात गरबा खेळल्यानंतर रात्री मुलेमुली कोठे जाता याचा कोणी तपास केला आहे काय? रोज पेपरमध्ये मुलामुलींच्या खरेदीची छायाचित्रे छापून येतात, त्यात मुलामुलींचा उत्साह दांडगा दिसतो.

भारतात लोकशाही असताना, कोणी कोणता सण साजरा करावा, कोणी कशात आनंद घ्यावा हे सांगणारे, हे सवंग पुढारी कोण? जर कोणा मुलामुलीची तक्रार नसेल तर कोणी का आक्षेप घ्यावा. यात कोणताही अश्लीलपणा डोकावत नाही, शेवटी कोण कोणत्या नजरेने पाहतो, कोणात काय विकृती आहे, हे कोण सांगणार, आणि ते लोक त्याप्रमाणेच कृती करणार.

Unknown

1 comment:

Maithili said...

khoop chhan aahe hi post. mojkya shabdat aani phar changalya padhatine mandale aahet vichar.
mi aaplyashi aaniMANGALA SAMANT yanchyashi sahamat aahe.