विद्यार्थी वाचवा

४ जानेवारीला येथे ब्लॉग मध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल लिहीले होते, पण पुन्हा ते सत्र चालूच आहे, म्हणजे ही बाब किती गंभीर आहे यावर आता सरकार, समाजकारणी, शिक्षणतज्ञ, विचारवंतांनी सखोल जाऊन विचारमंथन करण्याची निकड आहे. ज्या पालकांच्या मुलांनी आत्महत्या केल्या ते जबाबदार तर आहेतच पण ते सुद्धा जबाबदार आहेत, ज्यांनी हा असा अभ्यासक्रम बनवून मुलांच्या माथी मारला आहे. मागे आम्ही लिहीले होते की इतिहास, भूगोले किंवा आताच्या गणिताचा व्यवहारात, आयुष्य जगण्यात काही फायदा आहे काय? जर गरज नसेल तर का आपण विनाकारण स्पर्धा माजवत आहोत. याचा अर्थ शिक्षणाला महत्व नाही असा नाही, तर त्याला फाजील महत्व देऊ नये.

प्राचीन काळी राजे लोक राजपुत्रांना अथवा सामान्य जन मुलांना गुरूकुलत, ऋषींच्या आश्रमात अध्ययानाला पाठवत तेव्हा ते गुरूजन मुलांना धनुर्विद्या, स्वसंरक्षण शिकवत. आता सुद्धा याची गरज आहे, कारण गुन्हेगारी एवढी बोकाळली आहे की, शाळेपासूनच स्वसंरक्षणाच्या  शिक्षणाचे महत्व आहे. तरमग त्या इतर विषयांची गरजच काय?

रविंद्रनाथ टागोर, इंदिरा गांधी, महात्मा फुले यांचे शिक्षण शाळा कॉलेजातून पदव्यांपर्यंत झाले नव्हते, पण त्यांचे कार्य? एखाद्या पंडिताला हादरवून सोडणारे होते. पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर घडविण्याची संधी द्यायला हवी, अणि तसे प्रोत्साहन शाळेकडून मिळायला हवे. पण शाळा तर पैसे कमवायच्या मागे लागल्यात त्यांना परत खाजगी क्लासेसची मदत आहेच. मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त कला व क्रिडा क्षेत्राकडे ओढा असेल तर त्यांना त्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे. निव्वळ नोकरीसाठी शिक्षण ही संकुचीत वृत्ती आता पालकांनी सोडून द्यायला हवी.

मुलं हळव्या मनाची, भावूक असतात, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे उमलू दिले नाहीतर ती कोमेजून जातात आणि अशा आत्महत्या समोर येतात. त्यामुळे मुलांची मानसिकता ओळखून शिक्षकांनी आणि पालकांनी जबाबदारीचे भान ठेवावे. मुलांच्या बाबतीत कोणताही आततायीपणा  करू नये.  

Unknown

No comments: