Monday, May 31, 2010

नवनिर्मिती

Monday, May 31, 2010

दिनांक २२ मे २०१० रोजीच्या वर्तमानपत्रात एक प्रमुख बातमी होती, अमेरिकेतील डॉ. क्रेग व्हेंटर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी प्रयोगशाळेत सजीव प्रजातीची निर्मिती केली. खरोखर त्यांनी निर्जीव वस्तुमधून सजीव निर्माण केला काय? मग जणू ते साक्षात विश्वामित्रच झाले म्हणा ना! आता आपणा जीव आणी जीवन समजावून घेऊ यात. पेशी हा जीवनाच सर्वात मुलभूत घटक आहे. पेशींचे कार्य म्हणजेच जीवनकार्य. मानवासारखा प्राणी बहुपेशीय आहे. या पेशी वेगवेगळ्या समूहात कार्य करतात. पेशींची अंतर्गत रचना फार गुंतागुंतीची असते. यात बाह्यावरण, आंतर आवरण, पेशीद्रव्य, रासायनिक संयुगे, आणि लाखो प्रथिने असतात. पेशीत केंद्रक असते, आणि या केंद्रकात डीएनएपासून बनलेली गुणसूत्रे असतात. ह्या DNA मध्ये A-अडेनाईन, T- थायमाईन, G-गॉनाईन, C-सायटोसीन अशा चार मूळ रसायनांच्या साखळ्या असतात. DNAचा रेणू म्हणजे चार अक्षरसमूहांची करोडे बेस असलेली साखळीच.

अशा काही हजार बेसेस प्रयोग शाळेत तयार करणे शक्य आहे, पण सलग गुणसूत्र तयार करणे शक्य नाही. मग यावर उपाय काय तर हे छोटे तुकडे एकत्र जोडणे, आणि हेच अवघड काम आहे. सध्याच्या प्रयोगात डॉ. व्हेंटर यांनी १०८६ बेसे लांबीचे छोटे DNA चे तुकडे करून ते मग एकत्र जोडून मोठा DNA तयार करण्याचे तंत्र विकसित केले. आणि हेच फार महत्वाचे आहे. डॉक्टरांनी प्रयोगशाळेत मायकेप्लाज्मा मायकोडीस ह्या जिवाणूचा १० लाखाहून जास्त बेसेस लांब असलेला संपूर्ण DNA तयार केला. आणि हा DNA मायकोप्लाज्मा काप्रिकोलम ह्या जिवाणूच्या पेशीत, शरीरात म्हणू यात संक्रमित केला. आता त्यांच्या असे लक्षात आलेकी, नव्या प्रत्यारोपित मायकोप्लाज्मा मायकोडीसचा DNA घेऊन वाढणार्‍या पेशी मायकोप्लाज्मा काप्रीकोलमच्या मिळाल्या. त्याचा त्यांनी अभ्यास केल्यावर असे आढळून आले की, ह्या पेशी काप्रीकोलमच्या नसून मायकोडीसच्या झालेल्या आहेत. म्हणजे त्यांनी काय केले, DNAची लांब साखळी तयार केली, जी कोणालाही शक्य नव्हती, आणि तिचे दुसर्‍या पेशीत प्रत्यारोपण करून, त्या पेशीची वाढ केली. A पदार्थाचे DNA काढून B पदार्थात घालून A चे B त रूपांतर केले, पण लक्षात घ्या B पदार्थ तयार केला नाही.  प्रयोगशाळेत DNA चे रूपांतर करता आले,पण ’सजीव’ निर्माण करता आलेला नाही. म्हणजेच नवी पेशी निर्माण करून तिची वाढ करता आलेली  नाही. DNA म्हणजे संपूर्ण पेशी नव्हे. कारण पेशीत इतर अनेक घटकही असतात.


0 comments

Wednesday, May 26, 2010

मूळ पेशी

Wednesday, May 26, 2010

दिनांक २५ मे च्या वर्तमानपत्रात एक अतिशय महत्वाची बातमी लक्ष वेधून घेत होती, ती म्हणजे डॉ. रमेश भोंडे आणि डॉ सतीश पत्की यांनी शोध निष्कर्ष काढला की, मानवाला वरदान ठरलेल्या मूळ पेशी (स्टेम सेल्स) मातेच्या दुधात असतात. आणि या मूळ पेशींच्या सहाय्याने बालमृत्यु रोखता येतील. हा त्यांचा शोध ’ह्युमन सेल’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने स्वीकारला आहे.

यात अतिशय महत्वा गुणधर्म आढळला, की या मूळ पेशींचे विभाजन होते. आणि या पेशी तरंगतात. आईच्या दुधातील मूळ पेशींचा वापर करून स्वादुपिंडाच्या पेशी, मेंदूतील चेतातंतू आणि हाडातील निर्मीती करण्यात यश येईल.

मूळ पेशींचा अर्थ असा, मूळ पेशींमध्ये अमर्याद काळपर्यंत विभाजन होण्याची क्षमता असते. त्या शरीरातील कोणत्याही अवयवातील पेशींमध्ये परावर्तित होतात. वाढत्या वयामुळे मूळा पेशींची संख्या कमी होते, तेव्हा या पेशी त्याठिकाणी पुन्हा रोपण करता येतील. असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. स्टेम सेल्स चिरंतन असतात.

अजून एक महत्वाचा शोध म्हणजे, शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या पेशीची निर्मिती केली. शिवाय त्या पेशींचे विभाजनही होते.     


0 comments

Thursday, May 20, 2010

भारतातील फाशी

Thursday, May 20, 2010

कसाबसारख्या निर्दय घातपात्याला शिक्षा देतांना न्यायालय म्हणते, जर त्याला वेळेत फाशी दिले नाहीतर, त्याच्या सुटकेसाठी दुसरे घातपाती प्रकर्ण भारताला सोसावे लागेल. न्यायालयाचा रोख अफझलगुरूच्या रेंगाळलेल्या फाशीकडे आहे. आता न्यायालये सुद्धा सरकारचे कान उपटत आहेत, पण शेवटी सरकार म्हणजे कोण? एक वेगवेगळ्या विचारांची, आचारांची बांधलेली मोळी.

अफझलगुरूने १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला केला. त्यात अफझलगुरू हा पुराव्यानिशी दोषी ठरला आणि त्याला न्यायालयाने १८ डिसेंबर २००२ रोजी फाशीची शिक्षा सुनावली. फाशीच्या शिक्षेला हायकोर्टात मान्यता लागते म्हणून हे प्रकरण हायकोर्टात जाऊन तिथे २९ ऑक्टोबर २००३ रोजी फाशीवर शिक्कामोर्तब झाले. तेव्हा या निकालावर आरोपीच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात अपील केले तेथेही ४ ऑगस्त २००५ रोजी फाशी कायम झाली. दिल्ली सत्र न्यायालयाने २० ऑगस्ट २००६ हा दिवस फाशीसाठी नक्की केला. या दिवशी तिहार जेलमध्ये फाशी दिली जाणार होती, परंतु त्याची बायको,अफसान गुरू हिने राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केला आणि मग त्याची लम्बी कहानी सुरू झाली. आजपर्यंत त्यावर विचार चालला होता, आणि असे जवळजवळ ५० अर्ज  प्रतिक्षेत आहेत. सर्व आरोपी मजेत सरकारी पाहुणचार झोडत आहेत. कसाबला जेव्हा फाशीची शिक्षा सुनावली गेली तेव्हा पुन्हा हे प्रकरण कबरीतून उकरले जाऊन अफझलगुरूच्या फाईलवरील धूळ झटकली गेली. आणि पुन्हा त्याचा काथ्याकुट चालू झाला.

मतांच्या राजकारणासाठी तर त्याच्या फाशीचा निकाल होत नसेल ना? सरकारला देशाच्या सुरक्षेची चाड नाही काय? का सरकार दहशतवाद्यांना घाबरून आहे? जर अफझलगुरूला फाशी द्यायला सरकारचे हातपाय थरथरतात तर हे सरकार दहशतवाद कसा रोखणार? सामान्य नागरीकांनी रोज सकाळी कामावर जाताना बायकोचे कुंकू पुसून जायचे काय? आता सामन्य जनतेने क्रांती करण्याची वेळ आलेली आहे.


0 comments

Sunday, May 16, 2010

जात गणना

Sunday, May 16, 2010

भारतात दर दहा वर्षांनी जनगणना होते आणि त्यावरून भारताची लोकसंख्या कळते. पण फक्त आकडाच कळतो. मग ह्या जनगणनेला काय अर्थ उरतो. जनगणना करतांना एका वाक्यात चालू सरकारबद्दल लोकांकडून मत नोंदवून घ्यावे, म्हणजे किती लोकांना हे सरकार पाहिजे ते कळेल.

या वेळेस लालूप्रसाद आणि मुलायमसिंगांच्या सहकार्‍यांनी सरकारला जनगणना जातीच्या आधारावर करण्यास भाग पाडले. म्हणजेच या जनगणनेत लोकांची जातही विचारली जाणार आहे. जातीच्या राजकारणामुळे आज देश कोणत्या थराला गेला आहे, जातपातीमुळे देशात कोणकोणती संकटे उभी आहेत, हे सरकारला कळत नाही काय? ’जी जात नाही ती जात’ हे विधान आज सरकारने खरे ठरवले आहे. हे सर्व जे चालले आहे ते मतांसाठीहे  न कळण्याइतकी  भारतीय जनता आता भोळी राहिलेली नाही. सर्व राजकीय पक्षांना लोकांच्या जातीशी काहीही देणेघेणे नसते, ते आता आपली वोट बॅंक तयार करणार. कारण या जनगणनेवरून कोणत्या भागात कोणत्या जातीचे लोक राहतात,यावरून राजकारण खेळले जाणार, हे उघड आहे.

जो कोणी आपली जात सांगेल, त्याला काय जातीचा दाखला मागणार काय? का त्याला समाजकल्याण खात्याचे व्हेरिफिकेशन मागणार? तो सांगेल ते जात खरी कशावरून? जर त्याने अशी जात सांगितली तर सरकार काय मदत करणार आहे.

जातीनिहाय जनगणना भविष्यात भारताला फार महाग पडणार आहे, एवढे बाकी निश्चित. ही जनगणना नसून जातगणना आहे.


1 comments

Saturday, May 15, 2010

वैदिक गणित

Saturday, May 15, 2010

आजच्या संगणकाच्या युगात आपण भारतीय आद्य वेद विसरत चाललो आहोत. त्यातीलच एक प्रकार म्हण्जे ’वैदिक गणित’. म्हणजे मोठमोठे भागाकार, गुणाकार, वर्ग, घन, समीकरणे वगैरे चुटकीसरशी कशी सोडवायची. याचे सखोल ज्ञान अथर्ववेदात विखुरलेले आहे. यात एकंदर सोळा सूत्रे आणि उपसूत्रे आहेत, या सुत्रांच्या अधारे कोणत्याही प्रकारचे उदाहरण कमीतकमी वेळात व श्रमात सोडवता येतं. आणि याचे सर्व श्रेय गोवर्धनमठ ( जगन्नाथपुरी ) चे शंकराचार्य ब्रम्हलीन स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांना जातं. यांचा जन्म १८८४ चा. मूळ नाव वेंकटरमण. १८९९साली मद्रास विद्यापीठाने त्यांना ’ सरस्वती ’ ही पदवी बहाल केली.

वैदिक गणितात एकंदर १६ सूत्रे आणि तितकीच उपसूत्रे आहेत. उदा. निखिलम्, उर्ध्वतिर्यग्भ्याम्, आनुरूप्येण, शेषाण्यङ्केन चरमेण, एकाधिकेन पूर्वेण, एकन्योकेन पूर्वेण वगैरे.

विद्यार्थ्यांच्या मनात गणिताबद्दल भय व तिटकारा असतो, कारण शाळांमधून शिकवली जाणारी पद्धत. आज भारतात अशा गणिताची जरूरी आहे. परदेशात वैदिक गणित शिकविण्यासाठे वेगळा विभाग आहे. आपल्या वेदांमधून उचलून परदेशी विद्यापीठात वैदिक गणित  शिकवले जाते आणि आम्ही...!

अजूनही वेळ गेलेली नाही. आता आपण वैदिक गणित शिकले पाहिजे, न पेक्षा याचा भारतात प्रसार झाला पाहिजे. स्वामीजींनी शोधून काढलेल्या वैदिक गणितातील सर्वच पद्धती सोप्या, सुटसुटीत व मनोरंजक आहेत.

आज्च्या युगात गणिताला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी गणित लागते. गणिताशिवाय विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती अशक्य आहे. समाजामध्ये गणिताविषयी एक प्रकारचे भय दाटले आहे, अगदी अमेरिकेतही हीच परिस्थिती आहे.  म्हणून आज या वैदिक गणिताची अत्यंत आवश्यकता आहे.


1 comments

Friday, May 14, 2010

अक्षयतृतीया

Friday, May 14, 2010

रविवार दि.१५ मे रोजी ’अक्षयतृतीया’ आहे, त्या निमीत्ताने. अक्षयतृतीया म्हणजे ज्या तिथीचा कधीही क्षय होत नाही. वैशाख मासातील शुद्ध तृतीयेला ’अक्षयतृतीया’ म्हणतात. यादिवशी कृत युगाला सुरूवात झाली, म्हणून कृत युगात या देवसाला पाडवा म्हणत. यादिवशी ब्राह्मणाला पाण्याचा कलश दान करतात, त्याने विष्णू, शिव आणि पितरांचे तृष्णाशमन होते. या दिवशी शेतकरी शेताच्या कामाला सुरूवात करतात. ते लोक वसंतोत्सव साजरा करतात. या दिवशी दान, हवन केलेले क्षयाला जात नाही, आणि पितरांविषयी केलेले कार्य अविनाशी होते. महत्वाचे म्हणजे या दिवशी सोने खरेदी करून घरातील सोन्यात ठेवल्यास सोने कधिही चोरीला जात नाही, ते अक्षय मालकाजवळच राहते. जर बुधवारी अक्षयतॄतीया आल्यास, त्या दिवसाचे दान जन्मजन्मांतरी प्रभावी ठरते. या दिवशी जो ताक दान करतो तो धनवान होतो.

अक्षयतृतीयेला भगवान परशुरामांचा जन्म झाला. त्यावेळेस सत्ययुग आणि त्रेतायुग यांवा संधिकाल होता म्हणजेच सत्ययुग संपून त्रेतायुग सुरू होत होते. त्रेतायुग आणि द्वापारयुगाच्या संधिकाली श्री प्रभु रामचंद्रांचा जन्म झाला. यादिवशीही अक्षयतृतीयाच होती. म्हणजेच युग प्रारंभ अक्षयतृतीयेला होते, एवढे महत्व या तिथीला आहे. श्रीराम आणि परशुराम यांच्याबद्दल सर्वसामान्य लोकात अनेक गैरसमज आहेत. या दिवशी परमपिता भगवानांच्या दिव्य आणि भव्य कार्याचे स्मरण करावे.

जे लोक या दिवशी भगवान श्रीकृष्णाला चंदन विलेपन करतात, ते वैकुंठ लोकाला जातात. यादिवशी आपण जे जे काही करू ते  निरंतर अक्षय राह्ते, म्हणून पुण्य कर्मच करावे. या दिवशी श्राद्ध अथवा तर्पण केल्यास पितर मुक्त होतात. यादिवशी कुलदेवतेची पूजा केल्यास अक्षय कृपा राहते. यादिवशी आंबरसाचा नैवेद्य दाखवावा, आणि आंबे खायला सुरूवात करावेत.

रविवारी अक्षयातृतीया असून मृग नक्षत्र आहे. सुकर्मा योग आहे. तैतिल करण असून चंद्र मिथुनेत आहे. गुरू मीनेत असून सूर्य वृषभेत आहे.

या दिवशी थोडेका होईना, आपल्या ऐपतीप्रमाणे सोने खरेदी करा.


1 comments

Wednesday, May 12, 2010

सर्व पास

Wednesday, May 12, 2010

भारतात केंद्र सरकारने एक कायदपास केला, या वर्षी पासून आठवीपर्यंत कोणाही विद्यार्थ्याला नापास करायचे नाही. आणि या वर्षापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. कोणाच्या डोक्यात असले खूळ येते कोण जाणे. याचे भविष्यात किती गंभीर परिणाम होतील याची कोणीच कशी दखल घेत नाही? आठवी पर्यंत परिक्षा नाही म्हणजे कोण अभ्यास करील. शिक्षक कशाला गंभीरतेने  शिकवतील? आणि पालक काय आनंदीच. पण तोच विद्यार्थी नववीला आला तर त्याला नववीचा अभ्यासक्रम झेपेल काय? मग तेव्हा परिक्षेत नापास होणार्‍या  मुलांचे काय? दहावीचे काय? या निर्णयाचे समर्थन करताना सांगण्यात येते की, विद्यार्थी अभ्यासाच्या ताणामुळे आत्महत्या करताहेत, अरे, हे काय कारण झाले? आत्महत्या का करतात याचे कारण शोधून काढले पाहिजे. जर उद्या दहावीच्या मुलांनी आत्महत्या केल्यातर दहावीची परिक्षा रद्द करणार काय? आम्ही मागे एकदा येथेच ब्लॉग मध्ये म्हटले होते की, दहावीच्या परिक्षेत कोणालाही नापास करायचे नाही. सर्वजण पास. ज्याला जसे मार्क मिळतील तसा त्याचा फायदा होईल. आणि बघा आमची भविष्यवाणी खरी ठरायची वेळ आली आहे.

अशा जर परिक्षा न होऊ लागल्या तर आपण स्पर्धेपासून मुलांना लांब ठेवत आहोत, आणि मग त्यांना जागतिक स्पर्धेत आपण कसे उतरवणार? यामुळे आपण एकच, नाहीतर भविष्यातील सर्व पिढ्या बरबाद करत आहोत याचे जाणीव कोणालाही नाही, अगदी पालकांनाही नाही. या देशातील विध्यार्थ्यांचे दुर्दैव दुसरे काय! काही दिवसानंतर शाळा ही संकल्पनाच भारतातून नष्ट होऊ नये म्हणजे मिळवले.


0 comments