Tuesday, April 27, 2010

I am sorry

Tuesday, April 27, 2010

साधारण १९६० साली राजकपूरचा हिन्दी चित्रपट आला होता, ’जिस देशमे गंगा बहती है’ त्यात राजकपूर एक वाक्य म्हणतो आमच्या भारत देशात भिकार्‍याला सुद्धा भीक द्यायची नसेल तर आम्ही म्हणतो,"बाबा, माफ कर." त्याचीही आम्ही माफी मागतो. लक्षांत घ्या I am sorry किंवा मला माफ करा हे शब्द आयुष्यात फार महत्वाचे आहेत. क्षमा मागायला सुद्धा फार मोठे मन लागते. कोणालाही ते जमत नाही. त्याचा आणि शिक्षणाचा सुद्धा संबंध नाही. रस्त्याने जाताना चुकून धक्का लागला तर फक्त म्हणा sorry बघा काय चमत्कार घडतो, नाहीतर महाभारतच. कधी कधी समोरासमोर माफी मागणे जड जाते, अहंकार दुखावतो, नंतर फोनवर माफी मागा, गुलाबाचे फूल किंवा बुके पाठवा परिणाम चांगला होईल. क्षमा मागणे म्हणजे कमीपणा नाही तर तो मनाचा मोठेणा दर्शवतो.

माझ्या माहितीत एक कुटुंब होते, अगदी सुखी. एकदा काय झाले याच्या आवडीची भाजी तिने केली नाही म्हणून त्यांच्यात शाब्दिक वाद झाले, दोघांनीही अबोला धरला. त्यांच्यात प्रश्न पडला, पहिल्यांदा कोणी बोलायचे, कोणीही माफी मागायला तयार नाही. कित्येक वर्षे हा संसार चालला होता. पण ते एकमेकांची सुखदुःखेसुद्धा जाणून घेत नसत. नंतर पुन्हा काही रागाने तो घर सोडून निघून गेला, तर तिने साधी चौकशी सुद्धा केली नाही. त्याचे बाहेर फार हाल झाले. नंतर तो खलास झाला पण ती त्याला बघायला सुद्धा  गेली नाही. संसाराचे वाटोळे झाले. पण त्याच वेळेस कोणीतरी माफी मागितली असती तर ? जैन धर्मात क्षमायाचना दिन पाळतात. या दिवशी शांतपणे विचार करून झालेल्या चुकांबद्दल माफी मागायची असते.

लक्षांत घ्या आपण केलेल्या चुकांची आपल्याला जाणीव होते, मनातल्या मनात आपल्याला ते बोचते, पण आपण ते उघड करू शकत नाही, मग आपल्याला त्रास होतो त्यापेक्षा उघड माफी, क्षमा मागून बघा मनावरील किती ओझे हलके होते ते. I am sorry हे शब्द जीवन बदलतात.

रात्री अंथरुणावर झोपायच्या आधी हात जोडून म्हणा," मी माझ्या पवित्र आत्म्याने, सर्व आत्म्यांची माफी मागत आहे. जर दिवसभरात माझ्याकडून काही चुक झाली असल्यास अथवा कोणी दुखावले गेले असल्यास मला, माझ्या आत्म्याला क्षमा करावी"


0 comments

Thursday, April 22, 2010

I.P.L.

Thursday, April 22, 2010

पूर्वीच्या काळी गावोगावी बाजार भरत असे आणि त्या बाजारात कोंबडे, बकरे एवढेच काय पैलवानही विक्रीला ठेवत. खरेदी करणारा काय करीत असे तर त्यांना खरेदी करून त्यांची एकमेकात झुंज लावत असत, त्यावर मग बोलीही लागायची. ज्यांच्यात झुंज असे तो कोठला याला काहीही किंमत नसे. झुंज लावणारे झुंज बघायला प्रेक्षकांकडून पैसे घेत. आता जी भारतात I.P.L. क्रिकेट स्पर्धा गाजते आहे, तो काय प्रकार आहे, ह्याच झुंजीचा ना? खेळाडूंची कोणीतरी लिलावाप्रमाणे बोली लावतो, आणि तो खेळाडू सर्व मान अपमान कंबरेला गुंडाळून त्या त्या मालकाकडून खेळतो. जे खेळाडू आधी देशाकडून खेळत, तेच स्वाभिमान विसरून झुंज खेळत आहेत. कोंबड्यांच्या झुंजीची कल्पना करा, आणि त्याची  I.P.L. शी तुलना करा, कोंबड्यांची झुंज तरी बरी वाटेल.

या I.P.L. मुळे भारताचे राजकारण ढवळून निघाले आहे. परदेशी खेळाडू कोट्यावधी रूपये कमावत आहेत आणि आपण भारतीय काळ्या बाजारात तिकीटे घेऊन सामन्यांसाठी गर्दी करतो, टी.व्ही.जवळ बसून तासन्‍तास खर्ची घालतो. देशाभिमान नाहीच. केवळ कोंबड्याच्या झुंजीची मजा. 

एक प्रसिद्ध बाबा म्हणाले, हा पैसा जर काळ्याबाजारातून, स्विस बॅंकेतून येत असेल, आणि आपल्या खेळाडूंना मिळत असेल तर मिळू देत ना? राजकारणी जो पैसा स्विस बॅंकेतून आणू शकले नाहीत, तो पैसा या निमीत्ताने जर भारतातील खेळाडूंना मिळत असेल तर काय बिघडले?  

उलट या झूंजी सरकारमान्य करा, त्यावर कर लावा, करमणूक कर लावा, आणि पैसा कमवा. असेच प्रकार दुसर्‍या क्षेत्रातही चालू करा.


0 comments

Thursday, April 15, 2010

ऑक्सिजन शिवाय

Thursday, April 15, 2010

ऑक्सिजनशिवाय जिवंत राहणारे आणि प्रजनन करणारे प्राणी शास्त्रज्ञांना सापडले आहेत. हे प्राणी भूमध्य समुद्राच्या तळाशी असलेल्या जमिनीवर राहतात. इटलीतील  अ‍ॅक्नोना विद्यापीठातील शास्त्रज्ञ रॉबर्टो डॅनोव्हारो यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले. त्यांनी लॉरिसीफेरा समूहातील तीन नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यांनी सांगितले की हे प्राणी आकाराने एक मिलीमीटर असून ते कवचधारी आहेत.

कवचात ते जेलीफीशसारखे दिसतात. त्यांच्यावर अधिक संशोधन केल्यावर त्यांना आढळून आले, की हे प्राणी ऑक्सिजनशिवाय जिवंत आहेत. या तीन प्रजातींपैकी एका प्रजातीला स्पिनोलोरिकस सिंझिया असे नाव देण्यात आले आहे. तर इतर दोन प्राण्यांना रूलीलोरीकस आणि प्लीसिलोरिकस अशी नावे देण्यात आली आहेत. आजपर्यंत केवळ जीवाणू म्हणजे बॅक्टेरियाच ऑक्सिजनशिवाय राहू शकतात, अशी समजूत होती. परंतु निसर्गाने ही समजूत खोटी ठरवली आहे. इतक्या वर्षांनंतरही अजूनही नवनवीन चमत्कार निसर्गात सापडत आहेत, म्हणजे अजूनही मानव भटकत आहे. पण आता हे  प्राणी ऑक्सिजनशिवाय कसे जिवंत राहू शकतात हे शोधून काढण्यात शास्त्रज्ञ गुंतले आहेत. शिवाय अजून एक चमत्कार म्हणजे हे प्राणी अंडी देत असल्याचे आढळून आले आहे.

आता आम्ही असा विचार करतो की, ते प्राणी पेशींपासूनच बनले असतील ना? मग त्या पेशी ऑक्सिजनशिवाय कसे चलनवलन करतात. त्यांच्या शरीरातील अवयव कसे काम करत असतील? ते दुसरा कुठलातरी वायू शोषून घेत असतील काय? प्रयोगशाळेत त्यांच्या पेशींची वाढ करून त्यांच्यापासून मनुष्य प्राणी निर्माण केले तर? (क्लोन). मानवाला दुसर्‍या ग्रहांवर जाण्याचा मार्ग मोकळा होईल.

याबद्दल सखोल संशोधन करता येईल. मी माझ्या प्रयोगशाळेत हा प्रयोग करणार.

( शास्त्रज्ञाचे मनोगत)


0 comments

Monday, April 12, 2010

संवय

Monday, April 12, 2010

आपल्या आयुष्यातील सर्वात कंटाळवाणा काळ कोणता तर कोणाची तरी वाट पाहणे. समजा कोणीतरी आपल्याला भेटायला एका ठिकाणी बोलावले आहे, आणि आपण त्याठिकाणी वेळेवर पोहोचतो, पण पलिकडचा इसम वेळेवर येत नाही, अशी चिडचिड होते पण आपण काही करू शकत नाही. बरं जाता पण येत नाही. काय करणार? अशा वेळेस एक उपाय असतो. प्रथम मनाचे समाधान करून घ्या, अरे तो ट्रॅफीक मध्ये अडकला असेल तर तो बिचारा काय करणार? बरं अशी वेळ आपल्यावर आली असती, आणि तो वाट पहात असता तर? बघा लगेच चिडचिड कमी होते की नाही. डॉक्टरची, वकीलाची वेळा ठरवून आपण त्यांच्याकडे जातो पण तेथेही वाट पहावे लागते, पण पर्याय नसल्याने स्वतःशीच चिडतो, अशा वेळेस जातानाच विचार करून जा की, तेथे आपल्या थांबावे लागणार आहे आहे तेव्हा एखादे पुस्तक वाचायला न्या, मग बघा कसे बरे वाटते. आजूबाजूचे लोक त्रासिक चेहरा करतात पण आपण मात्र ऐटीत पुस्तक वाचत असतो, मजा येते. त्यासाठी मी एक युक्ती केलीय. मी घरी रोज सकाळ आणि पुढारी दैनिके घेतो, ती वाचल्यावर दुसर्‍या दिवशी त्यातील विनोद कापून एका वहीत चिकटवून ठेवतो, रोज दोन तीन प्रमाणे आता कितीतरी विनोद जमलेत, जेव्हा वेळ जात नाही तेव्हा ही वही कामाला येते. घरात ही वही टी पॉय ठेवली आहे, पाहुणे आले की, प्रतिक्षेच्या वेळेत त्यांचाही वेळ चांगला जातो.

जर कोणाचा आपल्या मोबाईलवर मिस कॉल आला तर रागवायचे नाही, विचार करायचा अरे त्याला वाटत असेल याला वेळ आहे की नाही? मग आपण काय करायचे न रागवता उलट त्याला मिस कॉल द्यायचा, आणि सूचित करायचे मला वेळ आहे फोन कर.

सकाळी उठल्यावर काही जणांना अंथरुणात लोळण्याची संवय असते. पण लक्षात घ्या हा वेळ कारणी लागत नाही, विनाकारण वाया जातो. जाग आल्या बरोबर ताबडतोब उठा आणि मग बघा कसा अर्धा तास वाचतो ते. पहिल्यांदा नको वाटेल पण मग संवय होईल. लोळण्यातून काही साध्य होत नाही. उलट आळस वाढतो. ही वेळ आपल्या दिवसभराच्या कामाच्या नियोजनासाठी वापरता येईल. कारण सकाळी मेंदू ताजातवाना असतो. भराभर निर्णय होतात. हीच वेळ आपल्यासाठी असते, बाकी दिवसभर आपण कोणासाठी तरी मेंदू वापरत असतो. हा एक तास वाचवून आपल्याला दिवस पंचवीस तासांचा करता येतो.


0 comments

दारू एके दारू

महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी धान्यापासून दारू गाळण्याचा निर्णय घेतला आणि चारी बाजूंनी रान उठल्यावर तो निर्णय मागे घेतला. पण असे निर्णय घेऊन लोकांची मने सतत ढवळत का ठेवायची हे काही समजत नाही. आता एक नवीनच फॅड सरकारच्या सुपीक डोक्यातून बाहेर आले आहे, करवंदापासून दारू निर्मिती करणे. आहे मग त्याला भरपूर अनुदान. मुळात एवढे गंभीर विषय सरकारपुढे असताना, हे राजकारणी दारू गाळण्याच्या का मागे लागले आहेत समजत नाही. सरकारला काय वाटते राज्यातील समस्त जनतेने तळीराम होऊन दिवस रात्र तर्र होऊन जावे काय?

राज्यात दिवसढवळ्या बलात्कार होताहेत, दरोडे पडत आहेत, तडीपार गुंड मोकाट सुटले आहेत, अजूनही जर्मन बेकरीच्या बॉम्ब स्फोटाच्या तपासात प्रगती नाही, आदिवासींचे प्रश्न भेडसावत आहेत, महावितरणने तर सरळसरळ दरोडेखोरी सुरू केलेली आहे, नक्षलवादी डोके वर काढताहेत, दुधाचे भाव रोज वाढताहेत, एक ना अनेक प्रश्न सरकारपुढे असताना सरकारला हे सर्व कसे काय सुचते एक परमेश्वरच जाणो. मला वाटते तोही बिचारा यांचे राजकारण बघून कंटाळला असेल. एकेकाळी औद्योगिक विकासात महाराष्ट्र देशात आघाडीवर असताना आता त्याची काय परिस्थिती आहे, हे सरकारने जाहीर करावे. दारू पिऊन विकास करता येत नाही. गावोगावी महिला बाटली आडवी करण्यासाठी जीवाचे रान करताहेत आणि त्याच राज्यात सरकार मात्र बाटलीचा पाया मजबूत करत आहे. या गुन्ह्याला माफी नाही. एकीकडे दारूबंदीची भाषा करायची आणि दुसरीकडे दारू गाळण्याचे परवाने द्यायचे.

हे सरकार काही दिवसांनंतर शालेय अभ्यासक्रमात दारू गाळण्याचा प्रोजेक्ट ठेवेल आणि त्यावर धडा सुद्धा असेल. अगदी महात्मा गांधींच्या फोटोच्या साक्षीने. सरकारने आता पुरस्कार जाहीर करावेत - दारूश्री, दारूभूषण, दारूविभूषण, दारूरत्न, दारूसम्राट, दारूकेसरी.

काय होणार आहे या महाराष्ट्राचे आणि येथील जनतेचे.

लोकमान्य टिळक गर्जले होते. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?


1 comments

Friday, April 09, 2010

पुनः स्वाईन फ्लू

Friday, April 09, 2010
साधारण २००९च्या सुमारास जगात स्वाईन-फ्लूने आपली मस्ती सुरू केली, आणि त्याची लागण भारताही झाली. जागतीक आरोग्य संघटनेने जगाला सावध केले. डॉक्टरांनी लोकांना घाबरवून सोडले. तेव्हा साधं सर्दी पडसे झाले तरी नाना शंका यायच्या आणि लोक तोंड झाकून घेत. प्रत्येकजण घाबरलेला होता. खूप गाजावाजा झाला. भयावह चित्र निर्माण केले गेले. परवाच एका बातमीत W.H.O. संघटनेचे आग्नेय आशियाचे संचालक सॅमली पियानबांग यांनी कबूल केलेकी लोकांच्या मनात भिती निर्माण करायला W.H.O. च  कारणीभूत आहे. जगातील एक तॄतीयांश लोकांना बाधा होईल असे W.H.O.ने जाहीर केले, पणा काय झाले रोगाची तीव्रता दिवसेदिवस कमीकमी होत गेली.आज या स्वाईन फ्लूची स्थिती काय आहे. कुठे गेली ती भिती. भारतातील १२० कोटींच्या देशात केवळ ३० हजार रूग्ण आढळून आले, त्यापैकी १४६५ जणांचा मृत्यु झाला.
स्वाईन फ्लूचा बागुलबुवा उभा करून डॉक्टरांनी आणि औषध कंपन्यांनी भरमसाठ फायदा लुटण्याचे कारस्थान W.H.O.च्या मदतीने तर केले नसेल ना? का शंका येऊ नये? यात फक्त औषध कंपन्यांचे उखळ पांढरे झाले. भविष्यातील अतिरंजीत, भितीदायक चित्र रंगवून बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून भारताने सुमारे दीड अब्ज डोस आयात केले, ते तसेच पडून आहेत. अशा किती देशात या औषध कंपन्यांनी धंदा केला असेल. शिवाय टॅमी फल्यूचा झटका वेगळाच.

0 comments

Wednesday, April 07, 2010

मरण

Wednesday, April 07, 2010

पुण्यात १३-२ ला बॉम्बस्फोट झाला. १७ जणांना प्राण गमवावे लागले. त्या आरोपींचा अद्यापही तपास लागलेला नाही. कोणीही बहुतेक मनावर घेत नाहीत. किती गंभीर घटना आहे. पण कुणाला काय त्याचे. बरे दहशतवादी सापडले तरी पुढे काय? हा प्रश्न असतोच. त्यांना पकडल्यावर त्यांची खातीरदारी सुरू. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रचंड पैसा खर्च होणार. खटला चालणार, आणि जर त्याचा निकाल जेव्हा केव्हा पाच दहा वर्षांनी लागेल तो पर्यंत त्याच्या सुरक्षेबद्दल पोलीसांचा जीव टांगणीवर. बरे खटल्याचा निकाल लागल्यावर तरी काय? मागील फाशीची शिक्षा झालेले आरोपी अजूनही तुरूंगात मजेत आहेत. काय गौडबंगाल आहे कळत नाही. त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणीच होत नाही. आता हे नवीन कैदी आले तर त्यांचा खर्च सुरू. आता एका कसाबवर किती पैसे खर्च होतायत. किती कोर्टाचे तास वाया जात आहेत. वाया याचा अर्थ असा यातून काय निष्पन्न होणार आहे. त्यापेक्षा त्याला गोळ्या लागल्या असत्या तर बरे झाले असते. नंतर तो तुरूंगात मजाच करणार ना?

कालच नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा भागात केंद्रीय राखीव दलाच्या गस्ती पथकावर बेछूट गोळीबार करून, ७६ जवानांना मारले, ते शहीद झाले. पण असे  का व्हावे? देशातील हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला आहे. नक्षलवाद्यांची एवढी हिम्मत झालीच कशी? त्यांच्यावर आतापर्यंत का कारवाई झाली नाही? काही नाही भारतात मरण स्वस्त झाले आहे.  सर्वात जास्त कोण मारत असेल तर, सरकारच. काय महागाई झाली आहे. दहशतवादी एकदाच मारतात, पण महागाई, भ्रष्टाचारा रोजच थोडेथोडे स्लो पॉईझनिंग करत आहे, भारतीय जनता रोजच मरणकळा सोसत आहे.


0 comments

Monday, April 05, 2010

साहित्य संमेलन

Monday, April 05, 2010

पुण्यात दि.२६, २७ आणि २८ मार्च या तीन दिवशी अखिल भारतीय मराठी साहिय संमेलनाचे सूप अखेर खूपशा राजकारणीय वादाने गाजले, आणि एकदाचे पार पडले. काही कोटी रूपये खर्च झाले. पण एवढे करून जे सामान्य नागरीक, त्यांना काय मिळाले याचा कोणी विचारच केला नाही.

मराठी पुस्तकांचे स्टॉल लागले होते, पण मराठी पुस्तकांची किंमतच एवढी की घेताना डोळे पांढरे व्हायची वेळ येत होती. पण गाजावाजा एवढा बस्स! किती पुस्तकांमधून किती टक्के पुस्तकांची वेक्री झाली, भेट दिलेल्या एकंदर रसिकांमधून किती टक्के रसिकांनी पुस्तके विकत घेतली हे मात्र जाहीर करणे सोईस्करपणे टाळण्यात आले.

खरंतर एवढे रसिक गावोगावाहून आले होते, एवढ्या देणग्या मिळाल्या पण त्याचा विवीयोग कसा झाला, हे काही सांगायला नको. एवढ्या पैशातून एखादी ज्ञानेश्वरी, तुकाराममहाराजांची गाथा, किंवा रामदासमहाराजांचे मनाचे श्लोक मोफत वाटले असते तर कितीतरी लोकांना फायदा झाला असता. हा विचार देणगी देणार्‍यांनी करायला पाहिजे होता. त्यांनी देणगीरूपाने पुस्तकांच्या प्रती विनामूल्य वाटायला पाहिजे होत्या.

ग्रंथ प्रदर्शनात एक मुस्लिम समाजाचा स्टॉल होता त्यांनी त्यांचा धर्मग्रंथ कुराण, ज्याची ९५० पाने आहेत, फक्त ५० रूपयांना विकत दिले. आता बोला. असे कोणी दानशूर हिंदू धर्मिया नाहीत काय? की जे गीतेची प्रत स्वस्तात उपलब्ध करून  देतील.

पण एकंदर संमेलनाने काही लोकांचाच उदौउदो झाला एवढे मात्र नक्की. 


0 comments